आज विशेष दिवस ! अहो आईचा ७५ वा वाढदिवस ! आणि त्यांच्या लग्नाला पण नुकतेच ५० वर्ष पूर्ण झाले!
मी या कुटुंबात सून होऊन आले त्याला पण आता २१ वर्ष पूर्ण होतील ! जरा थांबून मागे वळून पाहिलं ! कधी भेटले मी या सगळ्यांना? तेव्हा कळत पण नव्हतं कि माझ्या आई बाबांनी किती विश्वासाने मला एका नवीन आई बाबांकडे सुपूर्त केलं होतं !
नवरोबांचा हात धरून गृह प्रवेश केला पण पलीकडे सख्ख्या बहिणीसारखी साथ देणारी गोंडस नणंद आणि खंबीर पणे पाठीशी उभे राहणारे नवीन आई बाबा होते. एक नवीन रोपटं नवीन जागी जसं रुजतं तसंच काहीसं होतं ते ! नातेवाइकांसकट सगळीच माणसं खूप सांभाळून आणि सामावून घेणारी होती! तरीही थोडी धाकधूक असायचीच सुरुवातीला मनात!
पण आई बाबांनी असा काही जाणवू दिलं नाही कि हि दुसऱ्या कुटुंबातून आली आहे ! आणि तेही किती सहजपणे केलं त्यांनी !आता हा विचार केला तर किती कठीण असेल त्यांच्यासाठी असं वाटून गेलं ! स्वतःची लाडकी मुलगी नुकतीच सासरी गेलेली आणि घरी आलेल्या नवीन मुलीला आपलंसं करणे हे सोप्पं नसेल नक्कीच !
प्रत्येक कामात आई माझ्या बरोबरीने उभ्या असत. मला रोजचा किरकोळ स्वैपाक येत होता पण या घरातल्या पद्धती, कुणाला कसं आवडतं हे सगळं खूप patiently आणि सहजतेने शिकवलं मला. नेहेमी शांत , कुठेही गडबड गोंधळ आरडा ओरडा नाही ! काही चुकलं तर ना रागावता ते हळूच सुधारून टाकत ! एकदा मी पाहुणे येणार म्हणून वांग्याची भाजी केली आणि शेवटी पाणी घालायच्या ऐवजी ग्लास मध्ये ठेवलेलं तेल ओतलं भाजीत ! क्षण भर कळेच ना कि आता काय करू? सगळी भाजी वाया जाईल आणि सगळ्यांना काय वाटेल ! पण आईंनी शांतपणे मोठ्या चमच्याने जास्तीचे तेल बेमालूम पणे बाहेर काढले आणि कुणालाच झालेली गंमत कळली नाही :) किती हुश्श वाटलं मला आणि नकळत खूप छान वाटलं त्यांच्याकडे पाहून कि आई आहेत सांभाळून घायला! नवीन नवीन उपमा करताना गरम पाणी घातला कि माझ्या हातून गुठळ्या व्हायच्या रव्याच्या! मग मी त्यांना बोलावून आणायचे पाणी घालायच्या आधी आणि त्या मला शिकवायच्या कसं पाणी घालायचा ते!सगळे सण वार चाली रीती एक एक करत मला जमतील अशा शिकवल्या.
त्या नेहेमी मला सांगत. घरच्या बाई ने नेहेमी खंबीर असलं पाहिजे! घरात सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. घर आणि नोकरी दोन्हींचा समतोल साधता आला पाहिजे! त्यांनी स्वतः शिक्षिकेची नोकरी उत्तम रित्या केली होती. तेही घरातले सगळे सांभाळून. त्यांच्या गोष्टी सांगायच्या कधी कधी! नवल वाटायचं मला कि आपल्याला असा जमेल का? माझ्या आई ने पण हि कसरत साध्य केली होती. पण आता त्यामागचे कष्ट कळायला लागले होते. समोरून आदर युक्त भीती वाटेल असा व्यक्तीमत्व असलेल्या आई हळू हळू मोठा आधार आणि जवळच्या वाटायला लागल्या होत्या.
उत्तम शिवण काम, उत्तम स्वैपाक, व्यवहार ज्ञान, खंबीरपणा असं भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या आई माझ्या "Go To Person" कधी झाल्या कळलेच नाही.
इकडे बाबा पण सगळीकडे लक्ष देऊन असायचे. सुरुवातीला कधी आईंच्या ऐवजी काकू म्हणाले कि बाजूला घेऊन सांगायचे आई म्हण तिला :) त्यांच्याही मला वेगळ्या सूचना, माहिती देणे चालू असायचे. मी ऑफिस ची बस पकडायला उशीर झाला कि पळत जायचे रस्त्याने स्टॉप पर्यंत. मग बाबा मागून गाडी घेऊन यायला लागले कि पळत जाऊ नकोस मी सोडतो. मुद्दाम मला light चे बिल भर, येताना हे घेऊन ये ते घेऊन ये असा काही सांगून माझी परीक्षा घ्यायचे कि मी जबाबदारीने काम करते कि नाही!
मी जॉब करत असताना पहिल्या नातवाला दिवसभर जबाबदारीने सांभाळणे आणि स्वतःचीही नेहेमीची कामे चालू ठेवणे हे आनंदाने करत दोघेही. त्यामुळे मला लहान बाळाला सोडून जॉबला जाताना प्रश्न पडला नाही कि त्याला कोण सांभाळेल. किती गरजेचं होता तो आधार हे वेळो वेळो समाजत होते. आजही त्यांचं सगळ्या नातवांकडे बारीक लक्ष असतं आणि नातवांचे पण ते लाड पुरवून घ्यायचे हक्काचे स्थान आहेत :)
एवढ्या वर्षांमध्ये कधी कधी मतभेद होणं अपरिहार्य होते पण कितीही मतभेद झाले तरी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवताना जो संयम आणि परिपक्वपणा लागतो तो काय असतो याचे त्यांनी नेहेमी नकळत उदाहरण घालून दिले. आपला जाच न वाटू देता लक्ष देणं आणि गरज असेल तिथे खंबीर पणे पाठीशी उभे राहणं हि सोपी गोष्ट नसते.
अशा एक ना अनेक खूप गोष्टी आहेत. लाभले आम्हास भाग्य ...कि अशा आई बाबांचे छत्र डोक्यावर आहे! इतके मोठे झालो तरीही लहान असल्याची जाणीव त्यांच्या मुळेच जपली जाते. काहीही झाले तरी आपण हक्काने जाऊ शकतो अशी एक जागा!
आज त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे. वयाची ७५ री आणि सह जीवनाची ५० शी ! त्यांनी यापुढेही असेच आनंदी, निरोगी आणि खंबीर राहावे ही प्रार्थना आणि सदिच्छा! लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात पण त्यांच्या रेशीम गाठी व्हायला हा आशीर्वाद लागतोच !! तो कायम असाच आमच्या पाठीशी असावा हि प्रार्थना !








