Friday, January 2, 2026

जुळून येति रेशीमगाठी !!




आज विशेष दिवस ! अहो आईचा ७५ वा वाढदिवस ! आणि त्यांच्या लग्नाला पण नुकतेच ५० वर्ष पूर्ण झाले!

मी या कुटुंबात सून होऊन आले त्याला पण आता २१ वर्ष पूर्ण होतील ! जरा थांबून मागे वळून पाहिलं ! कधी भेटले मी या सगळ्यांना? तेव्हा कळत पण नव्हतं  कि माझ्या आई बाबांनी किती विश्वासाने मला एका नवीन आई बाबांकडे सुपूर्त केलं होतं !

नवरोबांचा हात धरून गृह प्रवेश केला पण पलीकडे सख्ख्या बहिणीसारखी साथ देणारी गोंडस नणंद आणि खंबीर पणे  पाठीशी उभे राहणारे नवीन आई बाबा होते.  एक नवीन रोपटं नवीन जागी जसं रुजतं तसंच काहीसं होतं ते ! नातेवाइकांसकट सगळीच माणसं  खूप सांभाळून आणि सामावून घेणारी होती! तरीही थोडी धाकधूक असायचीच सुरुवातीला मनात!

पण आई बाबांनी असा काही जाणवू दिलं  नाही कि हि दुसऱ्या कुटुंबातून आली आहे ! आणि तेही किती सहजपणे केलं त्यांनी !आता हा विचार केला तर किती कठीण असेल त्यांच्यासाठी असं वाटून गेलं ! स्वतःची लाडकी मुलगी नुकतीच सासरी गेलेली आणि घरी आलेल्या नवीन मुलीला आपलंसं करणे हे सोप्पं नसेल नक्कीच ! 

प्रत्येक कामात आई माझ्या बरोबरीने उभ्या असत. मला रोजचा किरकोळ स्वैपाक येत होता पण या घरातल्या पद्धती, कुणाला कसं आवडतं हे सगळं खूप patiently आणि सहजतेने शिकवलं मला. नेहेमी शांत , कुठेही गडबड गोंधळ आरडा ओरडा नाही ! काही चुकलं तर ना रागावता ते हळूच सुधारून टाकत ! एकदा मी पाहुणे येणार म्हणून वांग्याची भाजी केली आणि शेवटी पाणी घालायच्या ऐवजी ग्लास मध्ये ठेवलेलं तेल ओतलं भाजीत ! क्षण भर कळेच ना कि आता काय करू? सगळी भाजी वाया जाईल आणि सगळ्यांना काय वाटेल ! पण आईंनी शांतपणे मोठ्या चमच्याने जास्तीचे तेल  बेमालूम पणे बाहेर काढले आणि कुणालाच झालेली गंमत कळली नाही :) किती हुश्श वाटलं मला आणि नकळत खूप छान  वाटलं त्यांच्याकडे पाहून कि आई आहेत सांभाळून घायला! नवीन नवीन उपमा करताना गरम पाणी घातला कि माझ्या हातून गुठळ्या व्हायच्या रव्याच्या! मग मी त्यांना बोलावून आणायचे पाणी घालायच्या आधी आणि त्या मला शिकवायच्या कसं पाणी घालायचा ते!सगळे सण वार चाली रीती एक एक करत मला जमतील अशा शिकवल्या.  

त्या नेहेमी मला सांगत. घरच्या बाई ने नेहेमी खंबीर असलं पाहिजे! घरात सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. घर आणि नोकरी दोन्हींचा समतोल साधता आला पाहिजे! त्यांनी स्वतः शिक्षिकेची नोकरी उत्तम रित्या केली होती. तेही घरातले सगळे सांभाळून. त्यांच्या गोष्टी सांगायच्या कधी कधी! नवल वाटायचं मला कि आपल्याला असा जमेल का? माझ्या आई ने पण हि कसरत साध्य केली होती. पण आता त्यामागचे कष्ट कळायला लागले होते.  समोरून आदर युक्त भीती वाटेल असा व्यक्तीमत्व असलेल्या आई हळू हळू मोठा आधार आणि जवळच्या वाटायला लागल्या होत्या. 

उत्तम शिवण काम, उत्तम स्वैपाक, व्यवहार ज्ञान, खंबीरपणा असं भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या आई माझ्या "Go To Person" कधी झाल्या कळलेच नाही. 

इकडे बाबा पण सगळीकडे लक्ष देऊन असायचे. सुरुवातीला कधी आईंच्या ऐवजी काकू म्हणाले कि बाजूला घेऊन सांगायचे आई म्हण तिला :) त्यांच्याही मला वेगळ्या सूचना, माहिती देणे चालू असायचे. मी ऑफिस ची बस पकडायला उशीर झाला कि पळत जायचे रस्त्याने स्टॉप पर्यंत. मग बाबा मागून गाडी घेऊन यायला लागले कि पळत जाऊ नकोस मी सोडतो. मुद्दाम मला light  चे बिल भर, येताना हे घेऊन ये ते घेऊन ये असा काही सांगून माझी परीक्षा घ्यायचे कि मी जबाबदारीने काम करते कि नाही! 

मी जॉब करत असताना पहिल्या नातवाला दिवसभर जबाबदारीने सांभाळणे आणि स्वतःचीही नेहेमीची कामे चालू ठेवणे हे  आनंदाने करत दोघेही. त्यामुळे मला लहान बाळाला सोडून जॉबला जाताना प्रश्न पडला नाही कि त्याला कोण सांभाळेल. किती गरजेचं होता तो आधार हे वेळो वेळो समाजत  होते. आजही त्यांचं  सगळ्या नातवांकडे बारीक लक्ष असतं आणि नातवांचे  पण ते लाड पुरवून घ्यायचे हक्काचे स्थान आहेत :)

एवढ्या वर्षांमध्ये कधी कधी मतभेद होणं अपरिहार्य होते पण कितीही मतभेद झाले तरी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवताना जो संयम आणि परिपक्वपणा लागतो तो काय असतो याचे त्यांनी नेहेमी नकळत उदाहरण घालून दिले.  आपला जाच न वाटू देता लक्ष देणं आणि गरज असेल तिथे खंबीर पणे पाठीशी उभे राहणं हि सोपी गोष्ट नसते. 

अशा एक ना अनेक खूप गोष्टी आहेत. लाभले आम्हास भाग्य ...कि अशा आई बाबांचे छत्र डोक्यावर आहे! इतके मोठे झालो तरीही लहान असल्याची जाणीव त्यांच्या मुळेच जपली जाते. काहीही झाले तरी आपण हक्काने जाऊ शकतो अशी एक जागा! 

आज त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे. वयाची ७५ री आणि सह जीवनाची ५० शी ! त्यांनी यापुढेही असेच आनंदी, निरोगी आणि खंबीर राहावे ही प्रार्थना आणि सदिच्छा! लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात पण त्यांच्या रेशीम गाठी व्हायला हा आशीर्वाद लागतोच !! तो कायम असाच आमच्या पाठीशी असावा हि प्रार्थना ! 








Monday, July 7, 2025

बाते छोटी छोटी - अमेरिकेतील पाहुणे - अतिथी तुम कब....

अमेरिकेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या २ महिने तरी असतात. शाळांना सुट्ट्या असल्याने आणि हवामान चांगले असल्याने बरीच मंडळी प्रवास करतात. कधी मित्रांना / नातेवाईकांना भेटायला तर कधी पर्यटन म्हणून. साहजिकच जून / जुलै म्हणजे पाहुणे आणि पाहुणचार चा सुकाळ!

इथे लोकं लांबून येतात त्यामुळे शक्यतो मुक्काम करणे भाग असते. ऐरवी भेटणे होत नाही त्यामुळे सगळे जण एकमेकांच्या भेटी ची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. खूप प्रेमाने आणि हक्काने घरी येतात. आपण गेलो कि आपलाही पाहुणचार असाच प्रेमाने आणि अगत्यानं करतात. एवढ्या मोठ्या देशात आपली माणसं आहेत हि जाणीव खूप मोलाची असते! 

भारतातून अमेरिकेत आले तेव्हा मला हे सगळं नवीन होतं. इथे सगळी कामं घरी करायची, घराची साफ सफाई, स्वैपाक पाणी, आले गेले, मुलांच्या शाळा, नोकरी असेल तर अजूनच परीक्षा ! खूप दम छाक व्हायची रोजची कामे करतानाच. त्यातून पाहुणे येणार म्हटलं कि आनंद जेवढा व्हायचा त्याच्या दुप्पट टेन्शन यायचा कि सगळं कसं जमणार ! कुणी येणार म्हटलं कि घर छान आवरलेलं पाहिजे, नेहेमी पेक्षा वेगळं साग्र संगीत जेवण , त्याचं प्लँनिंग , त्यांना कुठे तरी फिरायला घेऊन जाणे, दिवसभराच्या चहा नाष्टा जेवण सगळ्यांचे प्लांनिंग करून तशी तयारी करणे . पाहुणे गेले कि परत घर आवरणे.  त्यातून मुले लहान. त्यांचे पण पाहणे.  

सुरुवातीला हे सगळे खूप अवघड आणि दमवणारे वाटायचे. पण हळू हळू सवय झाली. आणि एक गोष्ट लक्षात आली कि आलेले पाहुणे सुद्धा खरेच आपले घर समजून आपल्याला मदत करतात.  आल्यावरचे वेलकम जेवण सोडले तर नंतर ची साफ सफाई, आपली गरज ओळखून एखादे काम करून टाकणे, अगदी भांडी धुवायला पण मदत करणे, एखादी गोष्ट राहिली आपल्याकडून तर समजून घेणे अशी मोठी मदत करत असतात. वेळो वेळी आपण केलेल्या अगत्याचे प्रामाणिक कौतुक करून आपल्या दमवणूकी वर फुंकर घालत असतात.  

हे आज लिहायचा कारण म्हणजे मागचा आठवडा हा असाच गम्मत आठवडा होता. 

माझी बहीण आणि तिचे  कुटुंब ३ वर्षांनी आमच्या घरी आले. आम्ही खूप आतुरतेने त्यांची वाट पाहत होतो. मुलांना मुले भेटली त्यामुळे ते पण खुश ! आल्यावर बहीण लगेच मला मदत करायला लागली. तेव्हा मी तिला म्हटले कि चार दिवस माहेरपण एन्जॉय कर. लगेच कामाला उभी राहू नकोस. मस्स्त लाड पुरवून घे ! त्यावर उलट मलाच खडसावलं तिने. "तुझ्या एकटीवर कामे टाकून मी माहेरपण कशी एन्जॉय करु शकेन ? पटपट सगळ्यांनी मिळून कामे करायची आणि एकमेकांबरोबर वेळ घालवायचा. आरामच करायचा असेल तर मी हॉटेल वर राहीन कि ! तिथे कुणी मला काम कर म्हणणार नाही.  सो डोन्ट वरी!"  बरीच वर्षे अमेरिकेत राहून आलेल्या अनुभवाचे बोल होते ते! 

माझी बहीणच काय, नणंद जरी तिच्या हक्काच्या माहेरी आली तरी हेच सांगते मला! सगळ्यांनी मिळून पटकन कामे संपवून वेगळे काही तरी करू ! एकमेकांबरोबर वेळ घालवू . तेच माझे माहेरपण ! कुठेही तिची अपेक्षा नसते मी तिला माहेरी आली म्हणून सगळं हातात द्यावं आणि तिने मस्स्त आराम करावा, लाड पुरवून घ्यावेत. फक्त तिच नाही तर तिचे अहो सुद्धा कुठलीही मदत करायला मागे पुढे पाहत नाहीत. मी जावई आणि हि माझी सासुरवाडी, माझा मान, मी कशाला काम करु ? याचा लवलेशही नसतो!

भारतातून आलेली माझी मावस जाऊ, नणंद, मावस सासूबाई, तिकडे कितीही नोकर चाकर हाताशी असले तरी इथे आल्यावर  माझ्या बरोबरीने कामे करून रिकाम्या होतात! इथे कुणाची हेल्प नसते ते नं सांगता त्यांना कळते त्यामुळे कधीही टेन्शन येत नाही त्या असताना. त्यांची सून ( अर्थात माझीही) आणि मुलगा वयाने लहान असून पण घरी आले कि काय मदत करू विचारतात आणि पुढे होऊन मदत करतात सुद्धा!

बहीण येऊन परत गेली आणि त्याच दिवशी एक खूप जवळचे मित्रमैत्रीण  आणि त्यांचे कुटुंब एक दिवसा करता आले.  मध्ये त्याच्या पाहुणचाराची तयारी करायला , घर नीट नेटका करायला वेळ नव्हता त्यामुळे मला जरा टेन्शन आले. ते किती वाजता येणार म्हणून मी फोन केला तेव्हा तिने स्वतःहून मला शांत केले कि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आताच तुमचे पाहुणे गेलेत सो साधेच काहीतरी जेवण कर. बाकी रात्री बघू ! किती हायसे वाटले तेव्हा ! त्यांच्या बरोबर तिचे आई बाबा, सासू बाई पण येणार होते. त्यांचाही खूप समंजस पणा ! कुठलीही मोठी अपेक्षा नाही कि असेच करायला हवे आणि तसेच करायला हवे.  उलट मी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. रात्री गप्पा टप्पा मारत झोपायला उशीर झाला आणि सकाळी खडबडून जाग आली कि आजी आजोबा चहा ची वाट पाहत असतील. आवरून खाली आले तर दोन्ही आजी शांतपणे चहा चे आधण ठेवून उभ्या होत्या. चहा साखरेचे डबे, दूध सगळे शोधून घेतले होते. मग मी टेक  ओव्हर करून त्यांना चहा कॉफी करून दिली तेव्हा माझ्याशी छान गप्पा मारल्या.  आणि लगेच स्वैपाकात काय मदत करू विचारले. तिच्या सासूबाईंनी कोबीची भाजी करणार आहे कळल्यावर लगेच कोबीचा ताबा घेतला कि मी चिरून देते तोवर तू बाकी तयारी कर. तिच्या आईने कोशिंबिरी साठी मुळा किसून दिला.  मग मैत्रिणीने पोळ्या भाजायला मदत केली. दोन्ही अहोन्नी आणि मुलांनी पाट पाणी - जेवणाची तयारी केली. जेवण झाल्यावर मागचे आवरायला मदत केली.  घरात ११ माणसे होती पण सगळ्यांनी मिळून केल्याने पटकन झाले सगळे आणि माझ्या एकटी वर ताण आला नाही ! जाताना आजी आजोबांनी भर भरून आशीर्वाद पण दिला!! 

मुलांना सगळ्यांना भेटून छान वाटले. पाहुणे गेल्यावर आम्ही हुश्श झालो पण आमच्या गप्पांमध्ये परत आमचे पाहुणेच होते :)  याचे मोठे कारण म्हणजे त्यांनी केलेले सहकार्य आणि आम्ही मनापासून केलेला पाहुणचार गोड मानून घेणे हेच होते!

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही जसे लहानपणी मामाकडे/ मावशी कडे जायचो, कधी ते आमच्याकडे यायचे, मावस,मामे, चुलत भावंडं भेटायची, खूप खेळायचो, लाड पुरवून घ्यायचो ! आज त्याच आठवणी आठवून जसे रमतो तसेच आमच्या मुलांना अमेरिकेत पण अशाच आठवणी भर भरून मिळतात यापेक्षा दुसरे काय हवे?

अतिथी तुम कब जाओगे? ...  पेक्षा , वापस कब मिलेंगे?  असे वाटणे जास्ती भाग्याचे नाही का?













Wednesday, June 29, 2022

बाते छोटी छोटी - शब्दावाचून कळले सारे ....



काल मस्त drive करत होते .  Highway वरून exit lane मध्ये शिरायचे होते . तीच lane मागून दुसऱ्या रोड वरून highway ला merge होणारी पण होती. मागून एक कार येताना मला दिसली. अगदीच जवळ होती ती.  त्यामुळे मी आधी कि ती आधी हे कळणे गरजेचे होते. मी थोडा मागे पाहून right indicator दिले तसे त्या कार ने लेफ्ट indicator दिले. समजायचे ते समजून मी स्पीड वाढवला आणि exit lane मध्ये शिरले आणि माझ्या मागून ती कार highway ला merge झाली. 

किती सोपे ! एकही शब्द न वापरता शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले ! असे वाटून गेले क्षणभर ! नकळत मी त्या सुसाट जाणाऱ्या कार कडे बघून smile केले . 

हे नसते कळले किंवा हा कॉमन सेन्स traffic rule पाळला गेला नसता तर accident पण होऊ शकला असता. 

रोजच्या आयुष्यात पण असे होते ना नेहेमी ! आपल्या अवती भावतीच्या लोकांकडून आपण काही शब्दांच्या पलीकडले expect करत असतो. खास करून आपल्या जवळच्या व्यक्तींकडून . मग एखाद्या गोष्टीची त्यांना जाणीव होत नाही म्हणून आपले मन खट्टू होते. कधी कधी आपण सांगून सुद्धा कळत नाही तेव्हा तर विचारूच नका संवादाचे वादात रूपांतर होऊन आपला मुद्दा पटवून देण्याची जी काही शर्यत सुरु होते ! आपलाच मुद्दा कसा बरोबर हे पटवून देताना जरी जाणीव झाली कि समोरचा म्हणतो  तेही बरोबर आहे बरं का, तरीही आपलाही कसा बरोबर हे त्यालाही पटले पाहिजे ना !! मग होणार काय ? बरेच शाब्दिक accident होतात आणि बऱ्याच bhavana त्यात जीव गमावतात किंवा जखमी होतात. ज्यांचा कुठेही इलाज होणार नसतो किंवा इन्शुरन्स नसतो. 

अनोळखी लोकांबरोबर जर आपण हे कॉमन सेन्स rules पळू शकत असू तर मग जे आपल्या जवळचे आहेत त्यांच्या बरोबर सुद्धा ते लागू केले तर शब्दांच्या पलीकडले अजूनच दृढ होतील ना !! 


Thursday, June 10, 2021

बाते छोटी छोटी -२


खूप दिवसांपासून हा विषय मनात होता. पण आज लिहावेसे वाटले याला कारण मी पण तीच चूक केली !!


नाही नाही !! 😀!!खूप मोठी वाटेल अशी नाही पण मनाला न पटणारी एक गोष्ट केली !!😔😔

या वर्षी आम्ही घरात एक ठराव पास केला कि कुणीही घरी येणार असेल त्यांना आगाऊ (?)सूचना द्यायची कि मुलांसाठी चोकोलेट्स आणू नका . त्याला कारणही तसेच होते कि बऱ्याच वेळा लोक घाई घाई मध्ये येतात आणि आणायला सोपे , मुलांना आकर्षक असे मोठे मोठे चोकोलेट्स चे पॅकेट्स घरात येऊन पडतात. मग सारखे मुलांना कंट्रोल करावे लागते कि सारखे चोकोलेट्स खाऊ नका. 

ते पॅकेट्स  परत कुणाला भेट देणं  मनाला पटत नाही . त्यापेक्षा आणूच नका सांगितलं तर हळू हळू कळेल  लोकांना आणि समजून घेतील ते  नक्कीच !

खूप लोकांनी आमचा हा  'आगाऊ'  पणा  समजून घेतला आणि आमच्या विनंतीचा मान ठेवला. 

पण चकोलेट्स शिवाय अजूनही बऱ्याच गोष्टी आणणे आणि दुसऱ्यांच्या मुलांना देणे टाळले पाहिजे असे सतत मला वाटत राहिले. 

परवा  एक जण भेटायला आले . ते खूप जवळचे नव्हते त्यामुळे त्यांना आम्ही आगाऊ सांगू शकलो नाही  आणि त्यांनी पण अजाणतेपणी नेमकेबेकरी  स्वीट्स चे दोन मोठे पॅकेट्स आणले मुलांसाठी.  ते नाकारणे पण जमले नाही आम्हाला. एवढे मोठे पॅकेट्स आपण कसे संपवणार असा प्रश्न पडला !!

मग काय !!आम्हाला पण जायचेच होते २ ठिकाणी !

एक एक पॅकेट त्यांना देऊन टाकले !!! हुश्शा! घरातले पॅकेट्स तर गेले !

पण.... 

मनातले पॅकेट्स गेले नाहीत !!

जे मी माझ्या मुलांना खाऊ  घालणार नाही ते दुसऱ्यांच्या मुलांना देण्याची चूक मी केली जी माझ्याच तत्वाच्या विरुद्ध  होती ! म्हणून confession म्हणा किंवा माझ्या बरोबर इतरांनी पण हा विचार करावा यासाठी हा लेखन प्रपंच !

मी कितीही घाईत असले तरी दुसऱ्यांच्या मुलांना काही आणताना त्यांना ते उपयोगी पडेल का याचा कटाक्षाने विचार करते! आणि म्हणूनच माझेच मन मला खात राहिले. 

आजकाल प्रत्येक जण खाते पिते घर का असतो !! किंबहुना जास्तीच खात पीत असतो :)

त्यामुळे कुणाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये हे खरे असले तरी बळेच काही पण नेऊ नये हेही  महत्वाचे !

मध्ये माझ्या मुलाच्या वाढ दिवसाला अशाच एका साधन कुटुंबाने ओपन केलेले आणि नं  चालणारे खेळणे गिफ्ट दिले. तेव्हा वाईट वाटले कि नसतेच दिले तरी चालले असते ना?

खूप वेळा असे अनुभव येतात कि काही गोष्टी बळेच पास केलेल्या असतात . 

बाकी गोष्टींचे जाऊ देत... पण जेव्हा गोष्ट मुलांच्या आरोग्याची असते तेव्हा हा विचार व्हायलाच हवा !

काय देऊ शकतो आपण ?

- मुलांना घरी बनवलेला एखादा पौष्टिक खाऊ, ड्राय फ्रुटस, फ्रेश फ्रुटस, healthy snacks

- त्यांच्या वयाला साजेसे छोटेसे खेळणे, एखादा डोक्याला खाऊ असलेला game ?

- सहज जमेल अशी activity 

- वयाला  साजेसे छोटेसे पुस्तक?

- खेळताना वापरता येईल अशी एखादी वस्तू?


पर्याय खूप आहेत ! थोडासा विचार हवा !

काहीच नाही जमले तर आपला थोडासा वेळ !!

वेळे वरून आठवलं !

मागे आमचे खूप जवळचे मित्र कुटुंब भेटायला आले होते.

त्यांनी आल्या आल्या आधी मुलांशी संवाद साधला . मुलांना पत्ते  खेळायला दोन नवीनडाव  शिकवले. 

छोट्या मुलाशी त्याच्या सारखाच छोटा होऊन मस्ती केली ! त्याचे कौतुक केले !

मुलं खुश! आमच्याशी पण गप्पा टप्पा झाल्याच ! पण ते गेल्या नंतर पण आम्ही रोज ते game खेळताना त्यांची आठवण काढत होतो !

आपण पण असे करू शकतो अशी नकळत शिकावण आम्हाला पण मिळाली :)


कुठे तरी हे छोटे बदल घडायला हवेत ! आपली मुलं काय किंवा दुसऱ्याची काय ! काळजी सगळ्यांचीच घ्यायला हवी :)


आहे कि नाही ?बात छोटीसी मगर सोच नयी ?

ता. क . - वरील पर्यायांमध्ये अजून काही नक्कीच सुचवू शकता !







Thursday, March 26, 2020

इंग्लिश विंग्लिश !!! भाग -१!




गेले २ आठवडे इंग्लिश विंग्लिश ची श्रीदेवी असल्यासारखा वाटतंय !!! बऱ्याच काळापासून मनात असलेला "योग शिक्षक " अभ्यासक्रम पूर्ण करायचा स्वप्न सत्यात उतरत होतं ! स्वतःलाच किती वेळा चिमटे काढायची इच्छा होत होती !! हे खरंच घडतंय याचा विश्वास बसत नव्हता !

 दोन वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमाला रजिस्टर केले होते. पण जॉब  आणि बाकी कामांमुळे अभ्यास करायला मुहूर्त लागत नव्हता. प्रॅक्टिकल ला जाण्यापूर्वी अभ्यास पूर्ण करून  सगळ्या assignment पाठवायच्या होत्या आणि त्याची मुदत संपत आली होती. शेवटी मानाने  उचल खाल्ली आणि जॉब ला राम राम ठोकून बैठक मारून बसले. कारण त्याशिवाय वेळ मिळणं अवघड होतं. 'कुछ  पाने  के लिये , कुछ खोंना पडता है ' नियमानुसार मनाची समजूत घातली आणि तयारीला लागले. सकाळी लवकर उठून , मुलं शाळेत गेली की  , रात्री मुलं झोपली की  वेड्यासारखी वाचत होते. खूप वर्षांनी डोक्याला ताण मिळाल्याने सुरुवातीला अवघड वाटले . पण मग सवय झाली. अभ्यास केल्याचे एक वेगळेच समाधान मिळत गेले . ही  सगळी प्रक्रिया आवडायला लागली.

घरातही सगळे मला जमेल ती मदत करायला सरसावले. सकाळी बाबा (सासरे) लवकर उठले की मला रिंग देऊन उठवायचे. "अभ्यास करायचा आहे ना? "  मुलांना बजावायचे, " आई अभ्यास करते आहे, तिला त्रास देऊ नका !" आई (सासूबाई)  घरातली वरची काम माझ्यावर पडणार नाहीत याची खबरदारी घ्यायच्या. त्याही रोज सकाळी योगासने करत असल्यामुळे आमच्या चर्चा पण व्हायच्या काही नवीन वाचण्यात आले की .
मुलांसाठी तर आई अभ्यास करतेय हे एक नवलच  होतं. कारण ऐरवी अभ्यास त्यांनी करायचा असतो एवढंच
त्यांना माहिती होतं. आणि मग तेही शहाण्यासारखं मला वाचू देत ( आणि आपल्याला मिळणारे स्वातंत्र्य enjoy करत :) ) कधी कधी कंटाळून कधी संपणार तुझा अभ्यास असा तगादा पण लावत : ) कारण ऐरवी त्यांना मिळणारे संपूर्ण लक्ष कमी झाले होते. पण आजी आजोबा दुसरी बाजू उचलून धरत होते ! अमेरिकेतून अहो सुद्धा सतत देखरेख ठेवून प्रोत्साहन देण्याचे काम करत होतेच ! त्यामुळे अभ्यास पार पडला .  सगळ्या assignment पूर्ण करून पाठवून दिल्यावर हुश्शा केले !

आता वेळ आली प्रॅक्टिकल साठी रजिस्टर करायची. त्यासाठी लोणावळ्याला २ आठवडे राहायला जावे लागणार होते. मुलांना सोडून जायचे या कल्पनेने चलबिचल चालू होती. अशा वेळी एकदा कोपऱ्यावर मैत्रीण भेटली.
डोक्यात चालू असलेली द्विधा मनस्थिती तिला सांगितली. आणि तिने लग्गेच मला शांत केले !
"जा आणि कोर्स पूर्ण करून ये ! मुलांना बघायला आम्ही सगळे आहोत . काळजी करू नकोस !" किती बरं वाटलं एवढ्या एका वाक्याने ! बाकीच्याही मैत्रिणींनी सांगितले कि आम्ही अर्जुन ला खेळायला घेऊन जात जाऊ. काळजी करू नकोस. त्यामुळे परत उभारी धरून रजिस्टर केले .
उशिरा रजिस्टर केल्याने तिथे राहायची सोया होणार नव्हती. बाहेर हॉटेल मध्ये राहावे लागणार होते. पण एकटीने हॉटेल मध्ये राहायला  बरोबर वाटत नव्हते. आजकालच्या बातम्या वाचून मनात दडलेली भीती बाहेर येत होती . सगळ्यांनाच काळजी होती. मग आई बाबांनी जवळच्या नातेवाईकाकांना सांगून त्यांच्याकडे राहायची सोय केली ! एक काळजी मिटली ! ऑफिस मधली  एक मैत्रीण highway ला राहते. गरज पडली तर
माझ्या घरी  बिनधास्त ये राहायला असे मनमोकळे आमंत्रण दिले. तोही एक  option होता.

 आई बाबांबरोबर माझ्याही आईला बोलावलं रहायला.
आधी  आई बाबांची नर्मदा परिक्रमा त्याच वेळेस ठरलेली होती . तेव्हा (अगं ) आई ने दोन्ही मुलांना १५ दिवस सांभाळेन असं मला आश्वासन देऊन पाठिंबा दिला . या वयात तिने एकटीने दोघांना सांभाळणं तिच्यासाठी खूप challenging होतं तरीही !!! इकडे आई बाबांची पण ट्रिप कॅन्सल करायची  तयारी चालू होती . आणि  खरेच पुरेसे बुकिंग्स ना मिळाल्याने ट्रिप रद्द झाली !!! आणि आम्ही सगळेच हुश्श झालो . आता अहो आई बाबा  आणि अगं आई तिघंही मुलांबरोबर असणार होते त्यामुळे थोडे टेंशन कमी झाले . माझ्याहीपेक्षा या तिघांचा निर्धार ठाम होता मी कोर्से पूर्ण करावा म्हणून !!

आज्जी येणार म्हणून मुलं काय काय प्लॅन करण्यात मग्न होती. त्यामुळे  मी जरा निवांत झाले. 
सतत मुलांना बजावत होते , "मी नसताना असं  करा,  तसं करू नका " वगैरे . नक्की कळत  नव्हतं की ,  मी त्यांची तयारी करतेय की  स्वतःला समजावतेय !
निघायच्या दिवशी सगळी तयारी करून निघताना मुलं चिकटून बसली. शेवटी निघालेच. मोठ्यांचा आशीर्वाद घेतला . शेजारच्या काकूंनी पण तोंडभर आशीर्वाद दिला , 'यशस्वी होऊन ये '. शब्दात किती ताकद असते ते जाणवलं ! 

 आधी २ वेळा लोणावळ्याला  ड्राईव्ह करून गेले होते प्रॅक्टिस म्हणून. तेव्हा सगळे बरोबर होते. पण आता एकटीला जायचं होतं. सुरुवातीला उगीच दाटून आलेली भीती हळू हळू दूर झाली . highway वर गाडी मस्स्त पाळायला लागली.
एक वेगळीच जाणीव होत होती . आपण वेगळं काहीतरी करायला जातोय या निर्धाराने एक वेगळेच बळ आले.
कितीतरी वर्षांनी अशी एकटी बाहेर पडले होते. कैवल्यधाम ला पोहोचून सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या.
कोरोना च्या उद्रेका मुळे परदेशातून येणारे बरेच लोकं गळाले होते. त्यामुळे माझी कैवल्य धाम मधेच राहायची सोय झाली.  घरी सगळे  निर्धास्त  झाले !
त्या नंतर कैवल्यधाम मधले जे सुखद अनुभव आले त्यावर एक वेगळी पोस्ट लिहिणार आहेच.
रोजचे प्रॅक्टिकल्स , lecture, परीक्षा आणि प्रेसेंटेशन ची तयारी यात एक एक दिवस छान जात होता.
वेळ मिळाला  की घरी व्हिडिओ कॉल  करून आजी आजोबा आणि मुलांशी बोलत होते.  घरी दोन्ही आज्ज्या आणि आजोबा खिंड लढवत होते. मैत्रिणी पण अर्जुनला खेळायला नेत  होत्या .

एक आठवडा संपला आणि पुण्यात कोरोनामुळे लॉक डाउन जाहीर झाले.  तशी मला या सगळ्यांची काळजी वाटायला लागली. तेव्हा कोर्स पूर्ण करूनच ये असा ठामपणे सांगणाऱ्या आजी आजोबांचे मला खूप कौतुक वाटले . त्यामुळे मी शांतपणे लक्ष देऊ शकत होते. कोर्स मधल्या घडामोडी , गमती जमती सगळ्यांना रोज सांगत होते. अहो सुद्धा अमेरिकेतून रोज सकाळी मी उठले कि नाही याची खात्री करत होते. माझा good morning message किंवा कॉल आला नाही की लगेच कॉल यायचा. कारण रोज सकाळी ६.३० ला प्रॅक्टिकल असायचे . मध्ये मध्ये दोन्ही बहिणी, वन्स  बाई , मैत्रिणी  फोन करून माझी खबरबात घेत होत्या .
असे लाड करून घ्यायला खूप छान वाटत होते .

आज सगळ्या परीक्षा पूर्ण झाल्या. उद्या सकाळी समारोप समारंभ करून घरी परत जाणार !
एक स्वप्न पूर्ण केल्याचे वेगळेच समाधान वाटते आहे ! पण हे पूर्ण करताना घरच्यांनी घेतलेली काळजी , मैत्रिणींनी दिलेला आश्वासक आधार , मुलांनी दाखवलेला समजूतदारपणा, एवढं  बळ माझ्या पाठीशी होतं !
सगळा देश कोरोना मुळे बंद झाला तरी आमचा कोर्स चालू राहीला ! हे याच आशीर्वादांचं आणि शुभेच्छांचं फळ!!
एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असेल तर मार्ग मिळत जातात याची प्रचिती आली !!

याहून वेगळं भाग्य ते काय असतं ??




भाग -२... लवकरच ....
(नक्की इंग्लिश विंग्लिश का वाटलं ... )




 

Wednesday, May 19, 2010

I Love my cycle :)

लहानपणी आकर्षण वाटणारी सायकल! थोडे मोठे झाल्यावर शाळेत जायला हातात मिळाली :) मोठ्या बहिणीची ATLAS सायकल!आजीच्या वाड्यातल्या मैत्रिणीने, दीप्तीने सायकल चालवायला शिकवली :) शिकताना आधी नुसताच एक पाय paddle वर आणि दुसरा पाय जमिनीवर, मग हळूच दुसराही पाय paddle वर टाकून अर्धे paddle मारत तोल सांभाळणे, कधीतरी पहिल्यांदा धाडस करून मारलेला पहिला पूर्ण paddle , मग धिटाई वाढून आधी अंगणात आणि मग रस्त्याच्या कडेने मारलेल्या चकरा!! कधी धड्पले तरी उठून परत सायकल शिकायची उर्मी, मग लहान बहिणीला मागे बसवून " double seat " , शाळेत जाताना मैत्रिणींबरोबर लावलेली सायकल शर्यत !!...कित्ती आठवणी सायकलच्या :)

कॉलेजला गेल्यापासून scooty ,activa भुरळ घालायला लागल्या, मोठ्या शहरात घर आणि college अंतर मोठे, मग सायकल मागेच पडली. कधी आठवण पण नाही आली तिची :(

लग्नानंतर अहोंच्या वाढदिवसाला surprise गिफ्ट म्हणून ६ गेअर्स ची सायकल दिली :)घरात सायकल नव्हती. मग शेंडेफळ असल्यासारखा तिचा कौतुक वाटत राहिलं :) पण ते तेवढ्यापुरताच :( रोजच्या धावपळीत नंतर ती धूळ खात पडली:(
जवळ जवळ ३-४ वर्षांनी थोडा व्यायाम तरी होईल म्हणून तिला दुकानात नेऊन ठीक ठाक करून आणलं.आणि एका सकाळी मस्तं सायकल वर स्वार होऊन फिरायला गेले!! चढावरून जाताना दमछाक झाली पण तो आनंद वेगळाच होता :) जाताना दमछाक होणे, येताना उतारावरून paddle नं मारता सुर्र्रर्रर्र्र्र करत येणे, गार गार वारा, तोही कुठलेही प्रदूषण नं करता, पेट्रोल नं जाळता आणि CALARIES जाळता जाळता :)

परवा एक छान गोष्टं दिसली. आई बाबा २ सायकल वर २ बाजूंनी आणि त्यांची छोटीशी मुलगी छोट्याश्या सायकल वर त्यांच्या मधून मजेत फिरायला चालले होते :)

आता मी आठवड्यातून २-३ वेळा तरी सायकल वर फिरायला जाते सकाळी :) माझा हा उत्साह असाच टिकेल असा आता मलाच विश्वास वाटतोय. म्हणून लिहायचा धाडस केलं :)माझ्यासारखी थोड्या फार फरकाने प्रत्येकाचीच सायकल गोष्टं असणार. पण हे वाचून कुणाला सायकल चालवायची इच्छा झाली तर JOIN ME :)

फिरायला जाण्याव्यतिरिक्त जवळची कामं करायला सायकल वापरली तर प्रदूषणात आणि तब्येतीत किती फरक पडेल ;-? मी हे अजून सुरु केले नाहीये. केल्यावर कळवेनच :)
तूर्तास "चला सायकलस्वार व्हा :)"

Thursday, May 6, 2010

मंतरलेल्या गोष्टी! -"नटरंग"



तसे "नटरंग" प्रदर्शित होऊन बरेच दिवस झालेत. त्याचे समीक्षण वगैरे इथे लिह्याचा मानस नाहीये. मी आणि "अहों"नी खास "प्रभात" ला जाऊन पहिला होता हा सिनेमा :)कारण मराठी म्हणजे "प्रभात" हे समीकरण आजचे multiplex अजूनही मोडू शकले नाहीयेत :) सिनेमा पाहिल्यावर आम्ही दोघेही सारखेच वेडे झालो होतो!! त्यातली कथा, जरा हटके "नच्याचे" काम करणारा गुणा, सगळेच कलाकार आणि अप्रतिम संगीत!!! नंतर आम्ही परत आपापल्या कामात गुंतून गेलो. परवा ऑफिसमध्ये सहज एकाकडून mobile वर ऐकायला "नटरंग" ची गाणी मिळाली :) मी जाम खुश झाले !!! मग काय बस मधून जाता येता माझी पारायणं सुरु झाली :) प्रत्येक गाणं किती वेळा ऐकू असं प्रत्येक वेळी होतंय :) मंतरलेलं मंतरलेलं म्हणतात ते हेच असता का ? लगेच इंटरनेट वर "मेकिंग ऑफ नटरंग" शोधून काढलं. त्या कलावंतांचे अगदी स्पॉट बॉय पासून सगळ्यांचे अनेक क्षण टिपलेले फोटो पाहायला मिळाले :)
हा चित्रपट करायचा हे कुणी ठरवलं असेल तो क्षण आणि रसिकांनी त्याला HOUSE FULL करून टाकण्याचे यश...यामध्ये किती कष्ट घेतले असतील आख्ख्या टीम ने !!कसली धुंदी असेल प्रत्येकावर यात काम करताना? प्रत्येकाच्या कामाचा भाग जोडून एक सुंदर collage कसा तयार झाला असेल? आम्ही college मध्ये छोटी छोटी नाटकं, dances बसवायचो तेव्हा सगळेजण एका भारावलेल्या स्थितीत असायचे. तसंच यांचाही झाल असेल का?

अजय अतुल जोडीने अतुलनीय दिलेलं संगीत एखाद्यावर इतकी जादू करू शकतं?? त्यातला प्रत्येक शब्द, music piece , गाण्याच्या चाली, खूप मेहनत घेऊन विशिष्ट ग्रामीण पद्धतीने गायलेला प्रत्येक शब्द मंत्रमुग्ध करून टाकतात!!
"नटरंग उभा " मध्ये chorus चे किती कौतुक करावे तेवढे कमीच. कलावंताबद्दल किती आदर वाटतो हे गाणं ऐकताना!! देवाला आणि रसिकांना त्यांची "किरपा" मिळवण्यासाठी केलेली आर्जव मनाला भिडते !

"खेळ मांडला" मधली आर्तता अवर्णनीय आहे!!

"अप्सरा आली " मधला शृंगार बेधुंद करणारा आहे!! हे गाणं ऐकताना आपलंच मन घुंगरू बांधून नाचायला लागते :)

" आता वाजले की बारा" - उडत्या चालीने सगळ्यांना वेड लावून जातं :)

एक अप्रतिम कलाकृती !!! एक मंतरलेली गोष्टं!!! आणि काय लिहू?

PLease visit the link:
http://en.wikipedia.org/wiki/Natarang