Sunday, February 15, 2026

गोष्ट आईची !!


ही पोस्ट, खास आईच्या पंचाहत्तराच्या वर्षात पदार्पणा निमित्त्त! ७५ वर्षांची गोष्ट एवढ्या लहान पोस्ट मध्ये मावणार नाहीच. पण हा छोटासा प्रयत्न!

आईचा जन्म कर्नाटकातील छोट्याश्या कोकतनूर गावामधला ! ती अगदी लहान असताना आजी आणि आजोबा महाराष्ट्रातील अहमदनगर (आजचे अहिल्यानगर) मध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे आईला कानडी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. पण महाराष्ट्रात लहानाची मोठी झाल्याने मराठी वर विशेष प्रभुत्व !

आजोबांचे टेलरिंग चे दुकान आणि आजी केतकर हॉस्पिटल मध्ये काम करायची. घरची परिस्थिती तशी बेताचीच. आई च्या पाठी २ मावश्या आणि एक मामा. त्यामुळे आई काही वर्षे तिच्या मामांकडे सुद्धा राहिली. साहजिकच मोठी मुलगी म्हणून तिच्याकडून अपेक्षा आणि जबाबदाऱ्याही होत्याच. घरी शाळेची फी भरायला सुद्धा पैसे नसताना पुस्तकं मिळणे लांबची गोष्ट. पण तरीही तिने शिकायची जिद्द सोडली नाही. मोठी होऊन तिने शिक्षिका व्हायचे ठरवले. D.Ed. च्या प्रवेश साठी सुद्धा त्या काली लागणारी १ रुपया फी तिच्याकडे नव्हती. आजीचे मामा डॉक्टर हणमंतराव कुलकर्णी यांनी तिची फी भरली आणि तिला प्रवेश मिळाला. 

पुस्तके विकत घेता येत नसल्याने ती वर्गातच संपूर्ण लक्ष देऊन notes काढायची किंवा कधी कधी मैत्रिणी बरोबर पुस्तक share करून अभ्यास करायची. उत्तम बुद्धिमत्ता आणि शिकायची जिद्द असल्यामुळे परीक्षेत तिचा पेपर सर्वात उत्तम असायचा. शिक्षक तिचा पेपर मुलांना दाखवायचे कि असा अभ्यास असला पाहिजे. जेव्हा त्यांना कळले कि ती फक्त त्यांच्या नोट्स वरून अभ्यास करते, त्यांनी तिला कॉलेज च्या वाचनालयाची विशेष सवलत मिळवून पुस्तके दिली. 

शिक्षिका झाल्यावर तिने नगरच्या दादा चौधरी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी स्वीकारली.  जसा स्वतः अभ्यास मनापासून करायची तशीच तिचे शिकवणे सुद्धा खूप मनापासून होते. शिकवताना नेहेमी नवीन नवीन पद्धती वापरून ती मुलांना विषय उत्तम समजावून सांगायची. 

लग्न झाल्यावर बाबांनी तिला बी.एड. करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा ती पहिल्यांदाच आई सुद्धा होणार होती. पण बाबांनी तिला मागे फिरू दिले नाही. नोकरी, घरातली कामं, सासरची माणसे आणि एक नवीन जबाबदारी पोटात असताना, वारंवार उलट्यांनी बेजार होत असताना देखील तिने नेटाने परीक्षा दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण सुद्धा खाली. बाबांबरोबरच तिच्या आई चा आणि बहिणी चा तिला खंबीर पाठिंबा होता. तिची लाडकी लहान बहीण रेखा मावशी, आजही तिची सतत सुख दुःखात साथ देणारी. आजी चे घर गावातच असल्याने तीच तिची सपोर्ट सिस्टिम होती. आजीनेही वेळो वेळी आम्हाला सांभाळून तिला खंबीर साथ दिली. 

आम्ही तिघी बहिणी आईच्याच शाळेत जात असू. आमचे घर शाळेपासून ९ किलोमीटर लांब. त्या काळी कामाला कुणी मिळत नसे. पण घराचे सगळे करून, आम्हाला बरोबर घेऊन ती रोज बस ने शाळेत घेऊन जायची आणि तिच्या बरोबर परत आणायची. बाबा सुद्धा शक्य तेवढा प्रयत्न करायचे आम्हाला गाडी वर घ्यायला यायचा.

पण एवढा सगळं रोज करणे याचा दोघांनीही कधी बाऊ केलेला मला आठवत नाही. आईच्या शाळेत होतो पण आईने नेहेमी दुसऱ्या शिक्षकांच्या वर्गात घातले आम्हाला. बाईंची मुलगी म्हणून थोडे लाड व्हायचे पण अवाजवी लाड होणार नाहीत याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असायचे. त्यामुळे आम्ही चुकलो कि शिक्षा सुद्धा व्हायची!

आपली आई एक जबाबदार शिक्षिका आहे, तिचे तिच्या कामावर प्रेम आहे आणि ते उत्तम करण्याची तिची नेहेमी धडपड चालू असते हे तेव्हाही नकळत समजत होते आम्हाला. कुठलाही कार्यक्रम असला कि त्याचे नियोजन ते समारोप याची जबाबदारी बऱ्याच वेळा आई कडे असायची. तिचे वक्तृत्व, लिखाण, सूत्रसंचालन  नेहेमी उत्तम असायचे. शिकवण्या व्यतिरिक्त शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा विशेष सहभाग असायचा. मुलांकडून वेगवेगळे कार्यक्रम ती आवडीने सादर करून घ्यायची. मग ती गाणी, नाटक, स्वागत गीत, वक्तृत्व, कथाकथन काहीही असो. ती स्वतः कार्यक्रमासाठी साठी लेखन सुद्धा करायची.

तिचे अनेक विद्यार्थी आजही तिच्या संपर्कात आहेत. निवृत्त झाल्यावर सुद्धा तिचा शाळेशी नेहेमी संपर्क असतो. बऱ्याच वेळा काही सुधारणा करण्यासाठी तिने मदतही केली आहे. तिच्या विद्यार्थ्यांबरोबर आम्हा तिघी मुलींकडून सुद्धा तिने आमच्या गुणांप्रमाणे प्रोत्साहन दिले. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, परीक्षांमध्ये, कार्यक्रमांमध्ये  भाग घेण्यासाठी मार्गदर्शन केले. 

शाळेबाहेर ती लाडकी मावशी, आत्या सुद्धा होती. सुट्टी मध्ये मामा, मावशीची मुलं आवडीने आमच्या घरी राहायला येत. आमच्या साठी पर्वणीच असायची ती. जशी आजीने तिची साथ दिली तशीच तिनेही आजी अजीबची काळजी घेतली नेहेमी. आम्हाला शिक्षण साठी आजी आजोबांकडे ठेवतानाही तीच आमच्यावर बारीक लक्ष असायचे. नंतर बाबांनी तिघींना पुण्यात शिकायला पाठवले तरी तिचा रोज एक फोन असायचा. आमच्या आवाजावरून तिला समजायचे कि काही गडबड आहे का, किंवा आम्हाला काही त्रास आहे का.

मी १२ वि मध्ये असताना आजी चा accident झाला आणि बाबांना डायलिसिस सुरु झाले. माझी लहान बहीण सुद्धा तेव्हा १० वी मध्ये होती. आजी मामाकडे गेली आणि आई बाबांच्या पुण्यात ट्रीटमेंट साठी चकरा सुरु होत्या. वेळोवेळी  बाबांच्या ट्रीटमेंट बरोबर आजीलाही घरी आणून तिची काळजी घेणे अशी तारेवरची कसरत पार पाडताना आमच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये याची तिने कटाक्षाने काळजी घेतली. तुम्ही फक्त अभ्यास करा बाकी मी पाहते अशी नेहेमी खंबीर राहिली ती.

बाबांची ट्रीटमेंट ९-१० वर्षे चालली पण मी कधीही तिला अश्रू गाळत  बसलेले पाहिले नाही.  बाबांचा तिच्यावर खूप विश्वास होता. तिने सगळं खंबीर पणे करावा यासाठी ते नेहेमी तिला प्रोत्साहन देत. बाबा गेले तेव्हा लहान बहिणी चे लग्न सव्वा महिन्यावर होते.पिंडाला कावळा शिवत नव्हता तेव्हा तिने पुढे होऊन सांगितले कि मी गौरी चे लग्न नीट पार पाडेन आणि लगेच कावळा शिवला.  कुठले connection होते हे?  बाबा तिचे नेहेमी कौतुक असायचे. तिच्यासमोर तिची मजा करायचे पण ती नसली कि आम्हाला सांगायचे ती सगळं कसं उत्तम पार पाडते. 

घर नोकरी सगळं सांभाळताना तिला वाचायची आवड जपायला खूप वेळ मिळायचा नाही पण ती रोज काही नाही काही वाचायची.सुट्टीमध्ये एखादे पुस्तक, ऐरवीरोजचा पेपर तर नक्कीच वाचायची. त्यामुळे ती नेहेमी अपडेटेड असायची. सगळं सांभाळून ती स्वाध्याय परिवारात सुद्धा सामील झाली. मा. पांडुरंग शास्त्रीची सगळी पुस्तके तिने वाचली होती. निवृत्त झाल्यावर तिने ज्ञानेश्वरी, गीता आणि दासबोध यांचाही अभ्यास केला. सत्तरी नंतर तिने आत्ताच दासबोधाच्या परीक्षा सुद्धा दिल्या. आजही तिची आकलन शक्ती खूप छान  आहे. कुठल्याही विषयवार ती उत्स्फूर्त पणे लिहू आणि बोलू शकते. कविता देखील करू शकते.

प्रचंड जनसंपर्क. खूप साऱ्या मैत्रिणी, जाईल तिकडे माणसे जोडणे. दुसऱ्यांची नेहेमी मदत करणे. सतत आनंदी आणि उत्साही राहणे, सतत काही तरी नवीन शिकायचा, करायचा ध्यास त्यामुळे या वयात सुद्धा एकटी सगळं manage  करते. कधीही आम्हा मुलींकडून कडून कसली अपेक्षा केली नाही. स्वयंपूर्ण राहणे , उलट सतत आम्हालाच वेळो वेळी सपोर्ट करणे, काहीही झाले तरी मी तुमच्या पाठीशी आहे हा विश्वास नकळत आम्हाला देणे, बाबांची उणीव कधीही भासू न देणे हे सगळं ती लीलया करते. त्यामुळे आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही निश्चिन्त राहू शकतो. 

मुलींबरोबरच सगळ्या जावयांची लाडकी सासूबाई! जावयांना मान  देतानाच त्यांच्याशी नेहेमी खेळीमेळीचे नाते जपणे. बऱ्याच वेळा आम्हा मुलींपेक्षाही जावयांची जास्ती बाजू घेणे, त्यांच्या आवडी निवडी जपणे. ते भेटले कि उत्साहाने त्यांच्या आवडीचा स्वैपाक करून जेवून घालणे यात तिला खूप आनंद वाटतो.  

सगळ्या नातवंडांची लाडकी आजी. कुणाला काय आवडते हे तिला पक्के माहिती. त्याचे सगळे लाड उत्साहाने पुरवते. त्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक करते.  आणि विशेष म्हणजे नातवांकडून नवीन नवीन technologies शिकते. मग ते मोबाइलला वापरणे असो, लॅपटॉप वापरणे असो, गाणे किंवा video रेकॉर्ड करणे असो, ई-मेल, whatsapp, facebook, zoom सारखे applications वापरणे असो. काहीही येत नसेल तर नातवंशी बोलून लगेच ते शिकून घेते. 

या वयात सुद्धा तिने कधी सुगम संगीत तर कधी karaoke क्लास लावून गाण्याची आवड जपते आहे. नवीन नवीन गाणी तयार करून ती रेकॉर्ड करून आम्हालाही ऐकायला पाठवते. 

तिला प्रवासाची सुद्धा खूप आवड आहे. कुणावरही अवलंबून नं राहता मैत्रिणी किंवा बहिणी बरोबर वेगळ्या वेगळ्या सहलींसाठी जाते. वेगवेगळी ठिकाणे पाहते. त्याबद्दल लिखाणही करते. 

निवृत्त जीवन म्हणजे एक शेवट नाही तर नवीन सुरुवात असते आणि त्याचा पुरेपूर सन्मान करून मिळालेले  आयुष्य अर्थपूर्ण जगण्याचा तिचा सतत प्रयत्नअसतो. 



आज तिच्या या विशेष सोहळ्यानिमित्त तिला खूप खूप शुभेच्छा!. 

अशीच नेहेमी आनंदी, खंबीर आणि आरोग्यपूर्ण रहा. भरभरून आयुष्य जग आणि तुझं आमच्या पाठीशी असणं हे असंच आमचं नेहेमी शक्ती स्थान असावं ही देवाकडे प्रार्थना!





 










 


Friday, January 2, 2026

जुळून येति रेशीमगाठी !!




आज विशेष दिवस ! अहो आईचा ७५ वा वाढदिवस ! आणि त्यांच्या लग्नाला पण नुकतेच ५० वर्ष पूर्ण झाले!

मी या कुटुंबात सून होऊन आले त्याला पण आता २१ वर्ष पूर्ण होतील ! जरा थांबून मागे वळून पाहिलं ! कधी भेटले मी या सगळ्यांना? तेव्हा कळत पण नव्हतं  कि माझ्या आई बाबांनी किती विश्वासाने मला एका नवीन आई बाबांकडे सुपूर्त केलं होतं !

नवरोबांचा हात धरून गृह प्रवेश केला पण पलीकडे सख्ख्या बहिणीसारखी साथ देणारी गोंडस नणंद आणि खंबीर पणे  पाठीशी उभे राहणारे नवीन आई बाबा होते.  एक नवीन रोपटं नवीन जागी जसं रुजतं तसंच काहीसं होतं ते ! नातेवाइकांसकट सगळीच माणसं  खूप सांभाळून आणि सामावून घेणारी होती! तरीही थोडी धाकधूक असायचीच सुरुवातीला मनात!

पण आई बाबांनी असा काही जाणवू दिलं  नाही कि हि दुसऱ्या कुटुंबातून आली आहे ! आणि तेही किती सहजपणे केलं त्यांनी !आता हा विचार केला तर किती कठीण असेल त्यांच्यासाठी असं वाटून गेलं ! स्वतःची लाडकी मुलगी नुकतीच सासरी गेलेली आणि घरी आलेल्या नवीन मुलीला आपलंसं करणे हे सोप्पं नसेल नक्कीच ! 

प्रत्येक कामात आई माझ्या बरोबरीने उभ्या असत. मला रोजचा किरकोळ स्वैपाक येत होता पण या घरातल्या पद्धती, कुणाला कसं आवडतं हे सगळं खूप patiently आणि सहजतेने शिकवलं मला. नेहेमी शांत , कुठेही गडबड गोंधळ आरडा ओरडा नाही ! काही चुकलं तर ना रागावता ते हळूच सुधारून टाकत ! एकदा मी पाहुणे येणार म्हणून वांग्याची भाजी केली आणि शेवटी पाणी घालायच्या ऐवजी ग्लास मध्ये ठेवलेलं तेल ओतलं भाजीत ! क्षण भर कळेच ना कि आता काय करू? सगळी भाजी वाया जाईल आणि सगळ्यांना काय वाटेल ! पण आईंनी शांतपणे मोठ्या चमच्याने जास्तीचे तेल  बेमालूम पणे बाहेर काढले आणि कुणालाच झालेली गंमत कळली नाही :) किती हुश्श वाटलं मला आणि नकळत खूप छान  वाटलं त्यांच्याकडे पाहून कि आई आहेत सांभाळून घायला! नवीन नवीन उपमा करताना गरम पाणी घातला कि माझ्या हातून गुठळ्या व्हायच्या रव्याच्या! मग मी त्यांना बोलावून आणायचे पाणी घालायच्या आधी आणि त्या मला शिकवायच्या कसं पाणी घालायचा ते!सगळे सण वार चाली रीती एक एक करत मला जमतील अशा शिकवल्या.  

त्या नेहेमी मला सांगत. घरच्या बाई ने नेहेमी खंबीर असलं पाहिजे! घरात सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. घर आणि नोकरी दोन्हींचा समतोल साधता आला पाहिजे! त्यांनी स्वतः शिक्षिकेची नोकरी उत्तम रित्या केली होती. तेही घरातले सगळे सांभाळून. त्यांच्या गोष्टी सांगायच्या कधी कधी! नवल वाटायचं मला कि आपल्याला असा जमेल का? माझ्या आई ने पण हि कसरत साध्य केली होती. पण आता त्यामागचे कष्ट कळायला लागले होते.  समोरून आदर युक्त भीती वाटेल असा व्यक्तीमत्व असलेल्या आई हळू हळू मोठा आधार आणि जवळच्या वाटायला लागल्या होत्या. 

उत्तम शिवण काम, उत्तम स्वैपाक, व्यवहार ज्ञान, खंबीरपणा असं भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या आई माझ्या "Go To Person" कधी झाल्या कळलेच नाही. 

इकडे बाबा पण सगळीकडे लक्ष देऊन असायचे. सुरुवातीला कधी आईंच्या ऐवजी काकू म्हणाले कि बाजूला घेऊन सांगायचे आई म्हण तिला :) त्यांच्याही मला वेगळ्या सूचना, माहिती देणे चालू असायचे. मी ऑफिस ची बस पकडायला उशीर झाला कि पळत जायचे रस्त्याने स्टॉप पर्यंत. मग बाबा मागून गाडी घेऊन यायला लागले कि पळत जाऊ नकोस मी सोडतो. मुद्दाम मला light  चे बिल भर, येताना हे घेऊन ये ते घेऊन ये असा काही सांगून माझी परीक्षा घ्यायचे कि मी जबाबदारीने काम करते कि नाही! 

मी जॉब करत असताना पहिल्या नातवाला दिवसभर जबाबदारीने सांभाळणे आणि स्वतःचीही नेहेमीची कामे चालू ठेवणे हे  आनंदाने करत दोघेही. त्यामुळे मला लहान बाळाला सोडून जॉबला जाताना प्रश्न पडला नाही कि त्याला कोण सांभाळेल. किती गरजेचं होता तो आधार हे वेळो वेळो समाजत  होते. आजही त्यांचं  सगळ्या नातवांकडे बारीक लक्ष असतं आणि नातवांचे  पण ते लाड पुरवून घ्यायचे हक्काचे स्थान आहेत :)

एवढ्या वर्षांमध्ये कधी कधी मतभेद होणं अपरिहार्य होते पण कितीही मतभेद झाले तरी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवताना जो संयम आणि परिपक्वपणा लागतो तो काय असतो याचे त्यांनी नेहेमी नकळत उदाहरण घालून दिले.  आपला जाच न वाटू देता लक्ष देणं आणि गरज असेल तिथे खंबीर पणे पाठीशी उभे राहणं हि सोपी गोष्ट नसते. 

अशा एक ना अनेक खूप गोष्टी आहेत. लाभले आम्हास भाग्य ...कि अशा आई बाबांचे छत्र डोक्यावर आहे! इतके मोठे झालो तरीही लहान असल्याची जाणीव त्यांच्या मुळेच जपली जाते. काहीही झाले तरी आपण हक्काने जाऊ शकतो अशी एक जागा! 

आज त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे. वयाची ७५ री आणि सह जीवनाची ५० शी ! त्यांनी यापुढेही असेच आनंदी, निरोगी आणि खंबीर राहावे ही प्रार्थना आणि सदिच्छा! लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात पण त्यांच्या रेशीम गाठी व्हायला हा आशीर्वाद लागतोच !! तो कायम असाच आमच्या पाठीशी असावा हि प्रार्थना !